पनवेल : अनाथ व निराधारांसाठी सतत आणि तत्पर कार्यरत असलेल्या बालग्राम पनवेल अनाथाश्रमाचे संचालक डॉ. विनायक पाटील यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने नुकताच आचार्य पदवी प्रदान केली. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
'रोल ऑफ एनजीओ ईन ऑर्फन चाईल्ड केअर स्टडी ऑफ सोशल रिस्पोन्सिनल सोसायटी चिल्ड्रेन्स व्हिलेज पुणे' या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. या मोठ्या कामगिरीचे औचित्य साधून सत्कार समारंभाचे आयोजन बालग्राममध्ये करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकोला शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा अरविंद मोरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे विशेष सहाय्यक आणि विपणन सदस्य अरविंद मोरे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीपराव देशमुख, बालग्रामचे सहाय्य्क संचालक विजय गवळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. नीलिमा अरविंद मोरे म्हणाल्या की, आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी महापुरुषांचा आदर्श असणे गरजेचे आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श मिळाला. आज बालग्रामच्या विद्यार्थ्यांना डॉ. विनायक पाटील यांच्या रूपाने आदर्श व मार्गदर्शक मिळाला हि खरोखर अभिमानाची बाब आहे. त्यांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आपले संस्कारी जीवन घडवावे, असे सांगत पाटील यांचे त्यांनी कौतुक केले.
अरविंद मोरे यांनी सांगितले कि, डॉ. निलीमा मोरे यांनी खडतर परिस्थितीत व संघर्ष करून पीएचडी पदवी प्राप्त केली, त्याचप्रमाणे विनायक पाटील यांनी अनाथांचा सांभाळ करत पदवी प्राप्त केली. हि खरोखर सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी डॉ. विनायक पाटील यांच्या सुविद्य पत्नी पूनम पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा