(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅंकांनी कर्जाचे हप्ते वळते करू नयेत - मुख्यमंत्र्यांचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या

शेतकऱ्यांच्या अनुदानातून बॅंकांनी कर्जाचे हप्ते वळते करू नयेत - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक जिल्हा दुष्काळ आढावा बैठकीत

मुंबई ( १० मे २०१९ ) : जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देतानाच ज्या भागातून चारा छावण्यांची मागणी आहे तेथे तातडीने सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून कर्जाचे हप्ते वळते करू नयेत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांना सक्त सूचना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज 'ऑडीओ ब्रीज सिस्टम'द्वारे नाशिक जिल्ह्यातील सुमारे 35 सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आदींचाही सहभाग होता.

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रीत सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या संवादसत्रात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध भागातील सरपंचांनी सहभाग घेतला. सरपंचांनी गावातील पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अशा विविध समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. त्याची तातडीने दखल घेऊन सरपंचांनी मांडलेल्या प्रश्नांवर गतीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपणास सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विविध अधिकाऱ्यांना दिल्या.

नांदगाव तालुक्यातील बाबासाहेब जाधव यांनी 42 गाव पाणी पुरवठा योजनेबाबत समस्या मांडली होती. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी करावी आणि त्याचबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

तहसीलदारांनी गावातील २०१८ ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन अतिरिक्त टँकरची मागणी पडताळून पाहावी व त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणी पुरवठा होईल याची दक्षता घ्यावी. दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाय योजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपाययोजनांबाबत माहिती देताना नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले, जिल्ह्यात सुमारे 90 टक्के शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व टॅंकर्सचे जीपीएस ट्रॅकींग करण्यात येत आहे. चारा छावण्यांबाबत सात प्रस्ताव प्राप्त झाले असून दोन मंजूर करण्यात आले आहेत तर उर्वरीत तातडीने मंजूर केले जातील. धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्याबाबत आज आदेश काढण्यात आले असल्याचे मांढरे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव यु.पी.एस मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाय योजना

नाशिक जिल्ह्यातील बागलाण-37, चांदवड-13, दिंडोरी-01, देवळा-13, इगतपुरी-04, मालेगाव-47, नांदगाव-61, पेठ-02, सुरगाणा-05, सिन्नर-56, त्र्यंबकेश्वर-02,येवला-42 असे एकूण 283 टँकर सुरु आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वात जास्त 61 टँकर सुरु असून दिंडोरी तालुक्यात 01 टँकर सुरु आहे.

Ø पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ नाशिक जिल्ह्यात आज अखेर 15 विंधन विहिरी व 122 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्यात आली आहे.

Ø पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची रु. 6.21 कोटी इतकी विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आलेली आहे. व सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

Ø नाशिक जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरु करण्यात आलेली नाही. मागणीनुसार छावण्या त्वरीत सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी, नाशिक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी चारा छावणी चालकांना स्वत:च्या जागा नाहीत त्यांना शासकीय जागेवर छावणी उभारण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

Ø नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 8 तालुक्यातील 930 गावातील 4 लाख 80 हजार 589 शेतकऱ्यांना 249.47 कोटी रूपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

Ø नाशिक जिल्ह्यातील एकूण 28,893 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. सदर हंगामात नुकसान भरपाईपोटी रु.14.80 कोटी अदा करण्यात येणार असून त्यापैकी रु. 5 कोटी इतकी रक्कम 11,880 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

Ø प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 5.20 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 1.06 लाख शेतकऱ्यांना रु. 2 हजार प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रुपये 21.34 कोटी इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.

Ø महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात 1086 कामे सुरु असून त्यावर 41 हजार मजूर उपस्थिती आहे. सर्वात जास्त 1186 मजूर येवला तालुक्यात असून सर्वात कमी 122 मजूर उपस्थिती सिन्नर तालुक्यात आहे. जिल्ह्यामध्ये 16,950 कामे शेल्फवर आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget