सांगली ( २९ ऑगस्ट २०१९) : सांगली जिल्ह्यात पूरपश्चात उपाययोजना प्रशासन गतीने राबवित आहे. जिल्ह्यातील 104 गावातील ग्रामीण भागातील 45 हजार 195 कुटुंबे व शहरी भागातील 42 हजार 646 कुटुंबे बाधीत झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील 43 हजार 351 व शहरी भागातील 36 हजार 63 कुटूंबांना 39 कोटी 70 लाख 70 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 19 हजार 109 व शहरी भागातील 1280 कुटुंबाना 5 हजार रूपये वजा जाता उर्वरित 10 कोटी 83 लाख 45 हजार रूपयांची रक्कम धनादेशाव्दारे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
26 हजार 594 घरांची पडझड
पूरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 8 हजार 898 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे तर 17 हजार 696 घरांची अंशत: पडझड झाली आहे. शिवाय 958 गोठ्यांना पुराची झळ बसली असून 146 झोपड्या पडझड / नष्ट झाल्या आहेत. या सर्वांचे पंचनामे सुरू असून शहरी भागातही मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे, वाणिज्यिक पंचनामे सुरू झाले आहेत. पूरबाधित वाणिज्य मिळकतीची नुकसान झालेली 88 गावे बाधित असून 16 हजार 162 मिळकती आहेत. त्यापैकी 11 हजार 329 पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे गतीने सुरू आहेत.
पूरबाधित 69 हजाराहून अधिक कुटूंबांना मोफत धान्य वाटप
दिनांक 28 ऑगस्ट अखेर 69 हजार 971 कुटुंबांना एकूण 6997.1 क्विंटल गहू व 6997.1 क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तसेच एकूण 51 हजार 973 इतक्या बाधित कुटूबांना 5 लिटर प्रमाणे 2 लाख 59 हजार 865 लिटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.
50319.23 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा
पुरामुळे जिल्ह्यातील एकूण 249 गावांतील 1 लाख 20 हजार 231 बाधित शेतकऱ्यांचे नजरअंदाजे 66098.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी 97 हजार 701 शेतकऱ्यांच्या 50319.23 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा गतीने सुरू आहे.
97 पाणीपुरवठा योजना सुरू
जिल्ह्यातील 125 गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी 98 पाणीपुरवठा योजना पूरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सध्या 97 पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात 19 गावांसाठी एकूण 21 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 13 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किट वितरीत
राज्यभरातून जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या विविध मदतीचे वितरण महानगरपालिका व पूरबाधित तालुक्यांना करण्यात आले आहे. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे 23 हजार 351 किटचे वितरण करण्यात आले आहे. अजूनही किट बनविण्याचे काम सुरू असून जसजसे किट तयार होतील तसे त्याचे वितरण करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 329 एटीएम पैकी 24 एटीएम कार्यरत नसून कार्यरत असलेल्या एटीएमची संख्या 305 आहे. त्यामध्ये उपलब्ध निधी अंदाजे 56.37 कोटी इतका आहे.
टिप्पणी पोस्ट करा