मुंबई, दि.21 महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गृह मंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार राज्य मंत्री अदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा दिला. या लढ्यात 107 हुतात्म्यांनी आपले प्राणार्पण केले. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
00000
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिना’ निमित्त मी भावपूर्ण वंदन करतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं पाहिजे ही सर्व महाराष्ट्र प्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेनं एकजुटीनं, प्राणपणानं लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा वीरांना विनम्र अभिवादन.
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
00000
टिप्पणी पोस्ट करा