मुंबई : मुंबई अग्निशमनदलात कार आणि जीप चालविण्यासाठी खासगी तत्त्वावर चालक नेमण्याचा प्रस्ताव सोमवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. मात्र तो मंजूर न करता राखून ठेवण्यात आला आहे. पुढील बैठकीत प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सोमवारी हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आणि सर्व सदस्य त्यावर तुटून पडणार हे गृहितच होते. मात्र तो प्रस्ताव राखून ठेवण्यात असल्याने पालिका प्रशासन नगरसेवकांच्या रोषापासून बचावले.
दरम्यान, प्रशासनाच्या खासगीकरण निर्णयामुळे अग्निशमन दलात असंतोष निर्माण झाला आहे. मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेने विरोध दर्शविला आहे.
काळबादेवी आग दुर्घटनेनंतर नेमलेल्या समितीकडून अनेक शिफारसी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी रुग्णवाहिका, कार, जीप चालविण्यासाठी खासगी चालक नेमण्याची शिफारस स्वीकारून प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याला कामगार संघटनेने विरोध केला आहे.
मुंबई अग्निशमन दलात ३३ केंद्रात २ हजार ५७५ अधिकारी आणि जवान कार्यरत आहेत. पुरुष जवानांची संख्या १५७६ तर महिला अग्निशामकांची संख्या ११४ आहे. यामध्ये ४९९ वाहनचालक आहेत. ज्या वाहनचालकांकडे वाहन चालवण्याचा ज्या प्रकारचा परवाना असतो, त्यानुसार जीप वा जड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देऊन अग्निशमन जवानांमधूनच बढती देऊन त्यांना वाहनचालक केले जाते. गेल्या दोन वर्षांपासून अशा प्रकारे १०० अग्निशामक जवानांनी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांना वाहनचालक म्हणून बढती देण्यात आलेली नाही. असे असताना खाजगी भरती कशासाठी? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा