*रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, क्लब, जिमखाना इत्यादींमध्येही धडक कारवाई*
*सार्वजनिक ठिकाणी 'मास्क' आवर्जून परिधान करण्याचे पुन्हा एकदा आवाहन*
मुंबई : 'कोविड – १९' बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘बिना मास्क’ आढळून येणा-या नागरिकांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे व अधिक व्यापकतेने करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात शनिवार दिनांक २० फेब्रुवारी, २०२१ रोजी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यानुसार १६ हजार १५४ व्यक्तिंवर ‘बिना मास्क’ विषयक कारवाई करण्यात येऊन प्रत्येकी रुपये २०० यानुसार एकूण रुपये ३२ लाख ३० हजार ८०० एवढी दंड वसुली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत एकाच दिवसात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान करण्यात आलेली ही लक्षणीय कारवाई आहे.
दिनांक २० फेब्रुवारी, २०२१ रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान महापालिकेच्या २४ विभागांपैकी ‘के/पश्चिम’ विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ३४५ व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून रुपये ४ लाख ६९ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ‘के/पश्चिम’ विभागामध्ये प्रामुख्याने अंधेरी (पश्चिम) परिसराचा समावेश होतो. या खालोखाल ‘एच/पश्चिम’ विभागात १ हजार १५९ व्यक्तिंकडून रुपये २ लाख ३१ हजार ८०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ‘एच/पश्चिम’ विभागामध्ये प्रामुख्याने वांद्रे परिसराचा समावेश होतो.
..
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या शहर भागातील दक्षिण मुंबईत असणा-या ‘ए’ विभागात १ हजार ३० व्यक्तिंवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून रुपये २ लाख ६ हजार एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. ‘ए’ विभागामध्ये प्रामुख्याने कुलाबा, फोर्ट इत्यादी परिसरांचा समावेश होतो. या खालोखाल एल विभागात ८८६ व्यक्तिंवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून रुपये १ लाख ७७ हजार २०० एवढी दंड वसुली करण्यात आली आहे. एल विभागामध्ये प्रामुख्याने कुर्ला परिसराचा समावेश होतो.
..
या खालोखाल एफ/उत्तर विभागामध्ये ७४४ व्यक्तिंकडून रुपये १ लाख ४८ हजार ८००, ‘एस’ विभागात ७४३ व्यक्तिंकडून रुपये १ लाख ४८ हजार ६००, ‘जी/उत्तर’ विभागात ७०९ व्यक्तिंकडून रुपये १ लाख ४१ हजार ८००, ‘के/पूर्व’ विभागात ७०७ व्यक्तिंकडून रुपये १ लाख ४१ हजार ४००, ‘आर/मध्य’ विभागात ७०५ व्यक्तिंकडून रुपये १ लाख ४१ हजार, ‘पी/उत्तर’ विभागात ७०३ व्यक्तिंकडून रुपये १ लाख ४० हजार ६००, ‘एच/पूर्व’ विभागात ६३५ व्यक्तिंकडून रुपये १ लाख २७ हजार, ‘जी/दक्षिण’ विभागात ६३१ व्यक्तिंकडून रुपये १ लाख २६ हजार २००, ‘आर/उत्तर’ विभागात ६१६ व्यक्तिंकडून रुपये १ लाख २३ हजार २००, ‘एफ/दक्षिण’ विभागात ६०२ व्यक्तिंकडून रुपये १ लाख २० हजार ४००, ‘पी/दक्षिण’ विभागात ६०० व्यक्तिंकडून रुपये १ लाख २० हजार, ‘एम/पश्चिम’ विभागात ५९७ व्यक्तिंकडून रुपये १ लाख १९ हजार ४००, ‘एन’ विभागात ५८७ व्यक्तिंकडून रुपये १ लाख १७ हजार ४००, ‘आर/दक्षिण’ विभागात ५७२ व्यक्तिंकडून रुपये १ लाख १४ हजार ४००; तर ‘डी’ विभागात ५२१ व्यक्तिंकडून रुपये १ लाख ४ हजार २०० एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
..
या खालोखाल महापालिकेच्या ‘टी’ विभाग परिसरातून ३५२ व्यक्तिंकडून ७० हजार ४००, ‘सी’ विभाग परिसरातून २३७ व्यक्तिंकडून ४७ हजार ४००, ‘बी’ विभाग परिसरातून २१३ व्यक्तिंकडून ४२ हजार ६००, ‘एम/पूर्व’ विभाग परिसरातून १७८ व्यक्तिंकडून ३५ हजार ६००; तर ‘ई’ विभाग परिसरातून ८२ व्यक्तिंकडून १६ हजार ४०० रुपये एवढा दंड बिना मास्क प्रकरणी कारवाईपोटी वसूल करण्यात आला आहे.
..
'कोविड – १९' च्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह-यावर 'मास्क' (मुखावरण / मुखपट्टी) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच 'मास्क'चा वापर न करणा-या नागरिकांवर रुपये २०० एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे 'मास्क' वापरण्या विषयक जनजागृती सातत्याने करण्यासोबतच याबाबत नियम न पाळणा-या किंवा चेह-यावर मास्क न लावणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई दि. ९ एप्रिल २०२० पासून नियमितपणे करण्यात येत आहे.
..
*बृहन्मुंबई महापालिकेद्वारे नागरिकांनी 'फेस-मास्क' वापरावा, यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. तथापि, यानंतरही 'मास्क' वापरणे टाळणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जनजागृती व दंडात्मक कारवाई या दोन्ही बाबींमुळे सकारात्मक परिणाम साधला जाऊन व नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती साध्य होत आहे. परिणामी, कोविड – १९ ला आळा घालण्यासही मदत होत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेस-मास्क' घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
==
टिप्पणी पोस्ट करा