मुंबई : पुणे, सांगली, सातारा पाठोपाठ मुंबईतही लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने बीकेसी, सायन, राजावाडी आदी पालिका, सरकारी, खासगी अशी ९० लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे लसीच्या प्रतिक्षेत रांगेत उभ्या राहिलेल्या शेकडो नागरिकांना आपला संताप व्यक्त करीत घरी परतावे लागले. तर लसीकरण केंद्रावर, लसीचा साठा संपल्याने पुढील आदेश मिळेपर्यंत लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येईल, असे नागरिकांना सांगण्यात आले.
केंद्राने राज्याला व मुंबई महापालिकेला लसीचा आवश्यक साठा न पाठवल्याने परिणामी मुंबईतील २६ खासगी व ४ पालिका लसीकरण केंद्रे अशी एकूण ३० लसीकरण केंद्रे गुरुवारी संध्याकाळपर्यँत बंद झाली होती. आज सकाळपासून लसीकरणासाठी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर रांगा लावल्या होत्या. ज्या लसीकरण केंद्रात लसीचा जो काही साठा शिल्लक होता त्यातील लसीचा डोस घेण्यासाठी नागरिक आतुर झाले होते.
मात्र आज दिवसभरात १२० लसीकरण केंद्रांपैकी ३० लसीकरण केंद्रे अगोदरच बंद झाल्यावर उर्वरित ९० लसीकरण केंद्रांपैकी ६० लसीकरण केंद्रे आज दिवसभरात बंद झाली. या केंद्रांवरील लसीचा साठा संपुष्टात आल्याने ही सर्व केंद्रे बंद पडली आहेत. उर्वरित ३० केंद्रावर लसीकरण सुरू होते. मात्र या लसीकरण केंद्रांवरील लसीचा साठा संपल्यावर ही केंद्रेही बंद पडणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा