• *एकूण १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्रकल्प उभारण्याचे नियोजन
• *निविदा प्रक्रिया पूर्ण होताच एका महिन्यात साकारणार प्रकल्प
• *या १६ प्रकल्पातून प्रतिदिन मिळणार एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू
• *प्रकल्पांचे आयुर्मान किमान १५ वर्षे*
• *या प्रकल्पांमुळे प्राणवायू पुरवठ्यावरील महानगरपालिकेचे परावलंबित्व होणार कमी*
• *जंबो सिलेंडरशी तुलना करता आर्थिक खर्चातही निम्म्याहून अधिक होणार बचत*
मुंबई : कोविड-१९ विषाणू बाधेमुळे रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर मुख्यत्वाने प्राणवायू पुरवठ्याबाबत येणाऱया अडचणी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्राणवायू उपलब्धतेबाबत कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून एकूण १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प (प्लांट) उभारण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्णांना पुरवण्यात येईल. या सर्व १६ प्रकल्पांतून मिळून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू साठा निर्माण होणार असल्याने प्राणवायू पुरवठ्यावरील महानगरपालिकेचे परावलंबित्व कमी होण्यासही मदत होणार आहे.यासाठीच्या निविदाही यापूर्वीच मागविण्यात आलेल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू यांच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
*प्राणवायू प्रकल्पांची आवश्यकताः*
• कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात सर्वत्र रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. बाधित रुग्णांच्या फुप्फुसांना होणारा संसर्ग लक्षात घेता, त्यांना सातत्याने आणि अधिक क्षमतेने (लीटर प्रति मिनीट) प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवावा लागतो. यामुळे देशभरातील रुग्णालयांकडून प्राणवायूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
• असे असले तरी प्राणवायू उत्पादक आणि वाहतूकदारांच्या क्षमता व मर्यादा लक्षात घेता तसेच प्राणवायू उत्पादन, पुरवठा व वाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या मर्यादा पाहता मागणी व पुरवठा यांचा मेळ घालताना सरकार, प्रशासन यांची कसरत होत आहे.
• या सर्व स्थितीला मुंबईदेखील अपवाद नाही. वेळप्रसंगी प्राणवायू पुरवठ्याअभावी कोविड बाधित रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱया रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागले आहे. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रारंभापासून प्राणवायू उपलब्धता व त्याचा सुयोग्य वापर यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
• कोणत्याही अडथळ्याविना व सातत्याने रुग्णांसाठी प्राणवायू साठा उपलब्ध होणे आवश्यक असते. तथापि, सध्या प्राणवायू उपलब्ध करुन देताना होणारी कसरत पाहता प्रशासनाने पालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतःचे प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. परिणामी प्राणवायू उपलब्धतेतील अडथळे कमी होतील.
• प्राणवायू उत्पादकांवरील महानगरपालिकेचे परावलंबित्व कमी करण्यासाठी देखील अशा प्रकारच्या प्रकल्पांची नितांत आवश्यकता आहे.
• विशेष म्हणजे प्राणवायू पुरवठादारांकडून जंबो सिलेंडरद्वारे मिळणाऱया प्रती लीटर प्राणवायू खर्चाशी तुलना केली तर त्याच्यापेक्षा अर्ध्याहून अधिक कमी दराने या प्रकल्पांमधून प्राणवायू निर्मिती होईल. हे प्रकल्प किमान १५ वर्षे ते कमाल ३० वर्षे संचालित होवू शकतात. परिणामी महानगरपालिकेच्या आर्थिक खर्चात बचत करण्यासाठी देखील हे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
• बृहन्मुंबई महानगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर (क्युबिक मीटर) क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारला आहे. तर जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्ये देखील वर्षभरापूर्वी प्रतिदिन १ हजार ७४० घनमीटर (क्युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे. या दोन्ही रुग्णालयांतील प्राणवायू निर्मिती प्रकल्प व्यवस्थित कार्यरत असून कोविड-१९ संसर्गाच्या काळात ती अत्यंत मोलाची ठरत आहेत. हे दोन्ही प्रकल्प वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती या तंत्रावर आधारीत आहेत.
*नवीन प्राणवायू निर्मिती प्रकल्पांविषयीः*
• सद्यस्थितीतील कोविड साथरोगाच्या कालावधीत प्राणवायू पुरवताना होत असलेली कसरत पाहता, रुग्णांना प्राणवायू अखंडरीत्या व योग्य त्या प्रमाणात पुरवणे, ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीवर तातडीने मात करणे अत्यावश्यक आहे.
• कस्तुरबा व जोगेश्वरी रुग्णालयातील पूर्वानूभव चांगला असल्याने, प्रशासनाने महानगरपालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
• वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्मिती (पी.एस.ए.) तंत्राद्वारे जागेवरच (ऑनसाईट) प्राणवायूची निर्मिती (ऑक्सिजन जनरेशन) करणारे हे प्रकल्प (प्लांट) असतील.
• प्राणवायू पुरवठ्याची आत्यंतिक निकड पाहता, हे १६ प्रकल्प उभारण्यासाठी महानगरपालिकेने लघू ई-निविदा यांत्रिकी व विद्युत खात्यामार्फत प्रसारित केली आहे.
• निविदा प्रक्रिया पूर्ण होवून कार्यादेशास मंजुरी मिळताच एका महिन्यात हे प्रकल्प उभारले जातील.
• या सर्व १६ प्राणवायू प्रकल्पातून मिळून प्रतिदिन अंदाजे ३३ हजार घनमीटर (सुमारे ४३ मेट्रिक टन) इतका प्राणवायू साठा निर्माण करणे शक्य होणार आहे.
• महानगरपालिकेच्या रुग्णालयांची ऑक्सिजनची प्रत्यक्ष निकड, प्रकल्प उभारण्यासाठी लागणाऱया जागेची तसेच तेथील विद्युत पुरवठ्याची उपलब्धता/ क्षमता लक्षात घेवून एक किंवा दोन यंत्रं संबंधित ठिकाणी बसविले जातील.
• या १६ प्रकल्पांचा एकूण खर्च अंदाजे ९० कोटी रुपये इतका अपेक्षित आहे.
• या प्रकल्पातील संयंत्रांचे आयुर्मान किमान १५ वर्षे असते.
• या संयंत्रातून निर्माण होणाऱया प्राणवायूचा प्रती घनमीटर दर हा द्रव स्वरुपातील प्राणवायूच्या (लिक्विड ऑक्सिजन) दराइतकाच आहे. तर जंबो सिलिंडरशी तुलना करता त्याच्या अर्ध्याहूनही कमी आहे. त्यामुळे महानगरपालिकेची भविष्यात मोठी आर्थिक बचत देखील होणार आहे.
• महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये तसेच कोविड केंद्रांमध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचे प्रकल्प कायमस्वरुपी उभे तर राहतीलच, समवेत त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडर सांभाळण्याची व भरण्याची दगदग राहणार नाही. परिणामी यंत्रणेवरचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पी.वेलरासू यांनी सांगितले.
*या प्रकल्पात असा तयार होणार प्राणवायू..*
• हवेत आधीच प्राणवायू अर्थात ऑक्सिजन असताना पुन्हा तो शोषून नव्याने प्राणवायू कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्वाभाविक आहे.
• वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. (pressure swing adsorption) तंत्राचा वापर करुन रुग्णांना प्राणवायू पुरवठा करताना, सर्वप्रथम संयंत्रांमध्ये योग्य दाबाने हवा संकलित (कॉम्प्रेस) केली जाते.
• त्यानंतर ती हवा शुद्ध (फिल्टर) करण्यात येते. त्यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल/इंधन यांचे अतिसूक्ष्म कण, इतर अयोग्य घटक गाळून वेगळे केले जातात.
• या प्रक्रियेनंतर उपलब्ध झालेली शुद्ध हवा 'ऑक्सिजन जनरेटर' मध्ये संकलित केली जाते. ऑक्सिजन जनरेटर मध्ये असलेल्या झिओलीट (Zeolit) या रसायनयुक्त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन व ऑक्सिजन हे दोन्ही वायू वेगळे केले जातात.
• वेगळा करण्यात आलेला ऑक्सिजन अर्थात प्राणवायू हा योग्य दाबासह स्वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो वाहिन्या/पाईपद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवला जातो.
या प्रकल्पाची अनुषंगिक कामे प्रभावी पद्धतीने करण्यांसाठी उपायुक्त (विशेष) संजोग कबरे आणि प्रमुख अभियंता (यांत्रिक व विद्युत) कृष्णा पेरेकर प्रयत्नशील आहेत.
***
टिप्पणी पोस्ट करा