मुंबई : महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम धाब्यावर बसवत लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत केलेल्या अन्याय फेरफार, घोटाळयाबाबत आणि त्याद्वारे मुंबईकरांच्या केलेल्या फसवणुकीबाबत आज भाजपा नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत अनोखे गांधीगिरी आंदोलन केले.
नवी प्रभाग पुनर्रचना सत्ताधारी शिवसेनेने केवळ आपला राजकीय फायदा पाहून केली असून भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहत वाहत ठेवण्यासाठी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच केली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका बाह्य खाजगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकिय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आला असून ह्या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे.पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भारतीय जनता पक्षाने केला आहे.
* निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी अशी मागणी भाजपाने लेखी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा