विधान परिषदेत पुरवणी मागण्या मंजूर
सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर शासनाची भूमिका सकारात्मक
मुंबई, दि. 24; सन २०२१-२२ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी विभागाशी संबंधित अनेक विषय मांडले त्या सर्व मुद्यांची दखल घेतली असून चर्चेत उपस्थित मुद्द्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.
पुरवणी मागणीवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.श्री. देसाई म्हणाले, हिवाळी अधिवेशनात एकुण 31हजार 289 कोटी 26 लक्ष रकमेच्या मागण्या सादर केल्या आहेत. त्या पैकी 16 हजार 904 कोटी 37 लक्ष रुपये अनिवार्य खर्चासाठी आणि 548 कोटी 47 लक्ष एवढी रक्कम केंद्र पुरस्कृत योजनांसाठी प्रस्तावित आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर निदर्शनास येते की, सध्या महसूली जमेमध्ये मोठ्याप्रमाणावर घट झालेली असून राज्य शासनावर पडणारा अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी उपलब्ध साधन संपत्ती अपुरी असल्याने हा खर्च काटकसरीच्या उपाययोजना अंमलात आणून तसेच गरजेनुसार अधिकचे कर्ज काढून भागवावा लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनावरील कर्जाचा बोजा वाढून त्यावर द्याव्या लागणाऱ्या भविष्यातील व्याजाच्या रकमेत वाढ होणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरवणी मागणीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री सुधीर तांबे, भाई गिरकर, अंबादास दानवे, जयंत पाटील, रामदास कदम, रणजीत पाटील, किरण सारडा, किरण सरनाईक, अभिजीत वंजारी, प्रविण दटके, कपिल पाटील, नरेंद्र दराडे, निरंजन डावखरे, अवधूत तटकरे, नागो. गाणार, प्रशांत परिचारक, रमेशदादा पाटील, राजेश राठोड, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गिरीश व्यास आणि डॉ. प्रज्ञा सातव,यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा