मुंबई, २८ डिसेंबर २०२१: प्रस्तावावर उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोविडच्या काळात परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र हे अग्रेसर असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. धारावी मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. कोविड रूग्ण नोंदणी आणि मृत्यूच्या आकड्यांबाबत पारदर्शकता आणि प्रामाणिकतेत तडजोड केली नाही. महाराष्ट्रात रूग्णसंख्या जास्त होती पण ती लपवली नाही. मुख्यमंत्र्यांच्या याबाबत स्पष्ट सूचना होत्या. महाराष्ट्र हे प्रत्येक बाबतीत देशात मार्गदर्शक राज्य राहिले आहे, कोविड काळातही ते राहिले. देशात सर्वप्रथम टास्कफोर्स महाराष्ट्राने तयार केला. सर्व रुग्णालयांमध्ये समान उपचार पद्धती लागू केली. उपचारांच्या निर्णयामध्ये विलंब होऊ नये आणि कामामध्ये गती यावी यासाठी अधिकार आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी विकेंद्रीकरण करण्यात आले. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाद्वारे चमू तयार करून १२ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात आले. राज्यात ६ कोटी ८७ लाख टेस्टिंग करण्यात आल्या आहेत. तपासणीसाठी पूर्वी दोन प्रयोगशाळा होत्या, आता ६५० प्रयोगशाळा आहेत. देशाच्या तुलनेत राज्यात २५ टक्के बेड उपलब्ध केल्याचे प्रधानमंत्र्यांनीही मान्य केले. राज्यात ऑक्सीजनअभावी एकही मृत्यू झाला नाही. खाजगी रूग्णालयांमध्ये 80 टक्के बेड राखीव करून घेण्यात आले. त्यासाठीचे दरही निश्चित करून दिले. त्याचबरोबर चाचणी, औषधे, मास्क, प्लाझ्मा आदींचेही दर निश्चित करण्यात आले. कोविडविषयक सर्व बाबींचा सातत्याने आढावा घेण्यात आला. खाजगी रूग्णालयातील बिलांचे ऑडिट करण्यात येऊन या माध्यमातून 36 कोटी रूपये रोखण्यात यश आले. म्युकरमायकोसिससाठी देखील रूग्णालये राखीव ठेवली. औषधे, इंजेक्शन मोफत केली. यासाठी 21 कोटी रूपये खर्च झाले, तथापि नागरिकांना झळ पोहोचू दिली नाही. रूग्णांसाठी गरजेनुसार जम्बो हॉस्पिटल उभारली. आमदारांनी आपल्या निधीतून गरजेनुसार रूग्णवाहिका खरेदी केल्या. काही रूग्णालयांमध्ये लागलेल्या आगीच्या घटना या दुर्देवी होत्या, त्यापासून बोध घेऊन सर्व रूग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात 13 कोटी लसीकरण झाले असून 87 टक्के लोकांना पहिला तर 57 टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले. केंद्र सरकारने लस उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच आता 15 ते 18 वर्षातील युवकांसाठी लसीकरणाची परवानगी दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असल्याने सर्वांनी कोविडसंदर्भातील नियम पाळून काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा