जत तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठीची योजना
लवकरच अंमलात आणणार
- जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई, दि. 24 :- जत तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून ६ टीएमसी पाणी देण्याची योजना तयार करण्यातआली आहे. लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत सदस्य विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या ४० गावांना महाराष्ट्रात सामावून घेणे आणि पाणी मिळण्यासाठी कर्नाटक शासनाशी करार करण्यासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडला.
जलसंपदा मंत्री श्री.पाटील म्हणाले, या 65 गावांना 6 टीएमसी पाणी म्हैसाळ येथून देण्याची योजना करण्यात आली असून, तांत्रिक बाबीही पूर्ण करण्यात आल्या आहेत. जलसंपादन विभागाच्या या योजनेचा प्रस्ताव मंत्रीमंडळात मांडण्यात येणार आहे. यानंतर लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, या संदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असून यासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येत.
0000
कोरोना कालावधीत कार्यरत डॉक्टरांना
सेवेत कायम करण्यास शासन सकारात्मक
- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 24 : कोरोना कालावधीत ज्या वैद्यकिय अधिकारी यांनी कार्य केले त्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून, त्यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत अमिन पटेल यांनी कोवीड काळात काम केलेल्या डॅाक्टरांना नियमित करण्याचा औचित्याचा मुद्दा मांडला होता.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोनासारख्या भयंकर आजाराचा सामना करणाऱ्या सर्व कोविड योद्ध्यांना न्याय मिळणे महत्वाचे असून, या डॉक्टरांना शासकीय सेवेत नियमित करण्यासाठी वैद्यकिय शिक्षण विभाग सकारात्मक आहे. अर्थ व नियोजन आणि सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही या संदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.
०००
नाशिक येथील अमोल इगे हत्येप्रकरणी
दोषारोप पत्र दाखल करून कडक कारवाई करणार
- गृह राज्यमंत्री सतेज पाटील
मुंबई, दि. 24 : नाशिक येथे युनियनच्या वादातून अमोल इगे या युवकाचा खुन झाला. ही अत्यंत दुर्देवी घटना आहे. या हत्येचा तपास करत पोलीसांनी घटनेच्या दिवशीच आरोपीस अटक केली असून, या प्रकरणाचे दोषारोप पत्र दाखल करून चौकशीअंती दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत सदस्य सिमा हिरे यांनी नाशिक शहरात अमोल इगे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी लक्षवेधी मांडली होती. यास गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तर दिले.
श्री. पाटील म्हणाले, अमोल इगे यांची नाशिक येथे हत्या ज्या दिवशी झाली त्याच दिवशी दुपारी पोलीसांनी आरोपीस भिवंडी येथून अटक केली. सद्य स्थितीत विनोद बर्वे या आरोपीस न्यायालयीन कस्टडी रिमांड देण्यात आली आहे. अमोल इगे यांनी जर मृत्युपूर्वी सुरक्षा मिळण्यासाठी पत्र दिले असल्याचे आढळून आल्यास त्यावर कारवाई न केलेल्या पोलीस अधिका-यांवरही पोलीस मॅन्युअल प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री श्री पाटील यांनी सांगितले.
या लक्षवेधीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक, नाना पटोले, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
००००००
टिप्पणी पोस्ट करा