*- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांची पत्राद्वारे विनंती.*
- मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना देखील पाठवले पत्र
- पिकनिक पॉईंट उद्यानाच्या दुरावस्थेत वाढ
*मुंबई :*
गोरेगाव पूर्व येथील ‘पिकनिक पॉईंट’ उद्यानाच्या दुरावस्थेत दिवसें दिवस वाढ होत असल्याने या उद्यानाचे ‘स्व. मॉं साहेब मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’ उद्यानाच्या धर्तीवर विकास केल्यास आरेमध्ये येणार्या पर्यटकांसाठी आणखीन एक आकर्षणाचे केंद्र तयार होऊन येथील पर्यटकांमध्ये अधिकप्रमाणात वाढ होणार असल्याने, आरेतील ‘पिकनिक पॉईंट’ उद्यानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण, पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार रविंद्र वायकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना देखील त्यांनी पत्र पाठविले आहे.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आरेतील निसर्गरम्य वातावरणात ‘पिकनिक पॉईंट’ उद्यान आहे. याच उद्यानात पुर्वी मुंबई महानगरपालिका तसेच अनेक खाजगी शाळांच्या पिकनिक येत होत्या. स्थानिक जनता आरेमध्ये मोठ्याप्रमाणात मॉर्निंग वॉकसाठी येत असते. दर दिवशी तसेच शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी अनेक कुटुंबे आपल्या लहान मुलांसमवेत या पिकनिक पॉईंटमधील उद्यानात खेळण्यासाठी येतात. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये पिकनिक पॉईंट उद्यानाच्या दुरावस्थेत वाढ झाली आहे. या उद्यानातील हिरवळ नष्ट झाली असून येथील संरक्षण जाळ्या, बसण्यासाठीचे कठडे, बाकडी तसेच लहान मुलांना खेळण्याचे साहित्य तुटलेली आहेत. उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी आमदार निधीतून शक्य तितक्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या उद्यानाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे, वायकर यांनी मुख्यमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच उपनगराच्या जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.
पिकनिक पॉईंट या उद्यानाचा जोगेश्वरी येथील ‘स्व. मॉं साहेब मीनाताई ठाकरे शिल्पग्राम’ उद्यानाच्या धर्तीवर करणे आवश्यक आहे. या उद्याना १२ बलुतेदारांच्या प्रतिकृती, संगीतमय कारंजे, थिएटर आदी मनोरंजनाच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. या व त्यापेक्षा अधिक सुविधा पिकनिक पॉईंट उद्यानात केल्यास ते अधिक आकर्षक होऊन आरेतील पर्यटन क्षेत्रात वाढ होऊन पर्यटकांमध्ये अधिक वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या उद्यानाच्या विकासासाठी आवश्यक निधीची तरतूद केल्यास या उद्यानास गतवैभव प्राप्त होण्यास मदत होणार असल्याने निधी देण्यात यावा, असे पत्र मुख्यमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री, उपनगराच्या जिल्हाधिकारी यांना आमदार रविंद्र वायकर यांनी पाठविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा