(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन | मराठी १ नंबर बातम्या

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन

 


 

            पुणे, दि.1:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे असे ते यावेळी म्हणाले.

 

            यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, पर्यावरण व वातावरणीय बदल राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

 

            राज्यातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्राला शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने पहिली तर आपल्याला पुण्यातही हेच दिसते. कोरेगाव भीमा येथे जे शूरवीर शाहिद झाले. त्या सर्वांना अभिवादन करतो. हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावा आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी यंदाच्या अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती करण्यात आली आहे. त्यामध्ये अशासकीय सदस्यांचाही समावेश केला जाईल.  स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था आदी सुविधा देण्यास शासनाचे प्राधान्य राहील.

 

            उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, कोरोनाच्या बाबतीत  राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी नियमांचे भान ठेवले पाहिजे. लग्नसमारंभ आणि अशा प्रकारचे समारंभ मोठ्या स्वरूपात व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. परंतु, कोरोनाचा नवीन स्वरूपात आलेल्या विषाणूचा  संसर्ग वेगाने होतो  ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

 

            पाश्चात्य देशांत मोठया प्रमाणात बाधित रुग्ण सापडत आहेत. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमत मोजली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताच्या काळजीपोटीच राज्याने नियम कठोर केले आहेत. काही राज्यांनी रात्रीची जमावबंदी, टाळेबंदी केली आहे. राज्यात मुंबई आणि पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

 

            यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

 

            शौर्य दिनाला येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.  अनुयायांना जयस्तंभास  सुलभतेने  अभिवादन करता यावे यासाठी पोलिसांनीही सुयोग्य नियोजन केले. पीएमपीएल तर्फे बससेवा उपलब्ध करून देण्यात आली.

 

000


                                                                                                     

 

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले अभिवादन




 

            पुणे :  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.

 

            यावेळी ऊर्जामंत्री डॉ.  नितीन राऊत म्हणाले, कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ ऐतिहासिक आहे. या ठिकाणी शौर्य गाजविणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करताना  विशेष आनंद होत आहे. राज्य शासनाने या स्मारक परिसराचा विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून आवश्यक त्या सोयीसुविधा लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हा  स्तंभ शौर्याचे प्रतीक असल्यामुळे पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर शूरवीरांना अभिवादन करण्याचे स्थळ म्हणून विकसित करण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

                                                                                                    

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही केले अभिवादन

 

            तत्पूर्वी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही जयस्तंभास अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण केले.

 

00000

Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget